<p>नवउद्योजक घडविण्यासाठी इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धा संपन्न लघू उद्योग भारती नाशिक शाखेचा पुढाकार</p><p>लघु उद्योग भारती, नाशिक आयोजित “इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च – २०२३” स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा बुधवार, दि. १७ जानेवारी २०२४ रोजी हॅाटेल एक्सप्रेस इन, नाशिक येथे पार पडला.<br>याप्रसंगी श्री विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म, दिंडोरी, नाशिक, श्री. डॉ. गोरक्ष गर्जे, सह संचालक उच्च तंत्रशिक्षण व प्राचार्य शासकीय तंत्रशिक्षण नाशिक. लघु उद्योग भारती नाशिक चे अध्यक्ष, श्री. विवेक कुलकर्णी आणि कार्यवाह श्री. निखिल तापडिया हे व्यासपिठावर उपस्थित होते.</p><p>काही कार्यबाहुल्यामुळे मा. श्री नितिन गडकरी, सड़क परिवहन, राजमार्ग मंत्री, भारत सरकार यांना या कार्यक्रमास इच्छा असूनही येता आले नाही परंतू त्यांनी आपला दहा मिनिटांचा विशेष शुभेच्छा संदेश या कार्यक्रमासाठी पाठविला त्यात त्यांनी ग्रामीण भागातील औद्योगिकीकरण यावर विशेष भर देताना सांगीतले की शेतीक्षेत्र हे व्यावसायीक क्षेत्र व्हावे. प्रत्येक शेतकरी हा उद्योजक व्हावा व मुख्यत्वे तरुणांनी यात पुढाकार घ्यावा. आपण नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे कसे होऊ हे ध्येय असावे. लघु उद्योग भारतीचे ध्येय व टॅलेंट सर्च ह्या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.</p><p>लघु उद्योग भारती नाशिक चे अध्यक्ष, विवेक कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करताना सांगीतले की युवा अभियत्यांनी समोर विशिष्ठ ध्येय ठेवून ध्येयपूर्ती साठी सातत्याने कठोर परिश्रम करावे. शारिरीक आणि मानसिक संघर्षा साठी स्वःताला तयार करावे. लघु उद्योग भारती अशा गुणवान इंजिनिअर्सच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी दिला.</p><p>श्री प्रशांत कुलकर्णी व सौ. सुजात बच्छाव यांनी या उपक्रमाची प्रोसेस व त्यामागील दृष्टीकोन याबद्दल विस्तृत माहीती दिली. नाशिक शाखेतर्फे दरवर्षी "इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च" अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे तृतीय वर्ष आहे. सौ. बच्छाव यांनी "इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च – २०२४” स्पर्धेची उद्घोषणा केली व त्याबद्दल माहीती दिली. सुत्रसंचालन सौ. ऋता पंडित यांनी तर आभार प्रदर्शन श्री निखिल तापडिया यांनी केले.</p><p>आपल्या अध्यक्षिय भाषणात श्री. विलास शिंदे म्हणाले की, भारताच्या विकासात लघु, सुक्ष्म उद्योगांचा महत्वाचा वाटा आहे. भारताची सध्याची अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर आहे ती लवकरच २०२५ अखेर तिसर्या. क्रमांकावर येईल तर २०४७ पर्यंत भारत जगातील प्रगत दर्जाचे राष्ट्र म्हणून ओळखले जाईल. आज आपली अर्थव्यवस्था ३ ट्रिलीयन डॅालर इतकी असून ती लवकरत ५ ट्रिलीयन डॅालर कडे वाटचाल करील. आपल्या अर्थव्यवस्थेची स्पर्धा अमेरीका (२४ ट्रिलीयन डॅालर) व चिन (१८ ट्रिलीयन डॅालर) यांचे बरोबर आहे. आपले प्रश्न वेगळे आहेत. लोकसंखेत आपण चिनच्या पुढे आहोत. चिन प्रमाणे अर्थव्यवस्थेत आपल्याला कठोर निर्णय घेता येत नाहीत तर सर्व संमतीने व विचाराअंती निर्णय घ्यावे लागतात. आपला देश अनेक धर्म जाती पंथ यांनी नटलेला आहे. आजच्या तरुण वर्गापुढे गुणवत्ता, भांडवल व प्रगत तंत्रज्ञान असे महत्वाचे मुद्दे आहेत. शहरी व ग्रामीण भागातील समस्या अशा मुद्यांमुळे कशा मार्गी लावाव्या हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना सामोरा जाणारा धयेयवादी युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे.</p><p>छोट्या उद्योगांना ताकद देणे व त्यायोगे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे हे लघु उद्योग भारतीचे ध्येय आहे व अशा टॅलेंट सर्च स्पर्थेच्या माध्यमातून या तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही खूपच कौतुकास्पद बाब आहे. अमेरीका, चिन, जपान, जर्मनी ही राष्ट्रे आपल्यापेक्षा प्रगतशील आहेत ती मुख्यत्वे लघु, सुक्ष्म उद्योजकांच्या मजबूतीकरणामुळे व या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील लघु, सुक्ष्म उद्योजकांचे सक्षमीकरण महत्वाचे आहे.</p><p>याप्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील तीन व शैक्षणिक क्षेत्रातील तीन सर्वोत्तम स्पर्धकांची घोषणा या कार्यक्रमात झाली. ह्या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यास रोख रक्कम, ट्रॉफी, सर्टिफिकेट. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन श्री विलास शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला</p><p>काही अनिवार्य शासकिय बैठकांमूळे श्री. डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, श्री. संदीप कर्णिक, कमिशनर ऑफ पोलिस, नाशिक व श्री. मारुती मद्देवाड, अॅडिशनल डायरेक्टर, (इन्व्हेस्टिगेशन) प्राप्तीकर विभाग हे पाहुणे उपस्थित राहू शकले नाहीत परंतू या सर्वांनी आपले शुभेच्छा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून पाठवले ते कार्यक्रमादरम्यान दाखविले गेले.</p><p><br>ह्या कार्यक्रमास नावाजलेले उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, अभियंते, निमा, आयमा या औद्योगिक सघटनांचे पदाधिकारी, लघु उद्योग भारती कार्यकारीणी सदस्य इ. उपस्थितीत होते. तरुण इंजिनिअर्सनी या कार्यक्रमात नोंदविलेली उपस्थिती व दिलेला भरघोस प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.</p><p>खालीलप्रमाणे कॉलेज बक्षिसे-</p><p>रँक- १<br>प्रकल्पाचे नाव: सेल्फ-रेग्युलेटिंग अॅटोमायझर<br>डिप्लोमा कॉलेज<br>गुरु गोविंद सिंग फाऊंडेशनचे नाशिक<br>मेकॅट्रॉनिक्स विभाग</p><p>रँक- 2<br>प्रकल्पाचे नाव: रोडोमीटर<br>आयटीआय- कॉलेज<br>दुसरे वर्ष<br>शासकीय आयटीआय, चांदवड<br>नागरी विभाग</p><p>रँक- 3<br>प्रकल्पाचे नाव : ई वैद्य – अंगभूत ऑक्सिजनसह स्मार्ट व्हील चेअर<br>पदवी महाविद्यालय<br>चौथे वर्ष<br>कॉलेज- संदिप फाऊंडेशन, संदिप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, नाशिक<br>विभाग: इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार</p><p>खालीलप्रमाणे औद्योगिक बक्षिसे आहेत:</p><p>रँक- १<br>गॅब्रिएल इंडिया लि., नाशिक.</p><p>रँक- 2<br>एनएसके फॅब आणि वेल्ड, नाशिक.</p><p>रँक- 3<br>बजाज सन्स लि. नाशिक.</p>

